Table of Contents
तीळ लागवड तंत्र
![]() |
तीळ लागवड तंत्र |
तीळ हे भारतातील सर्वात जुने तेलबियाचे पीक असून जगात तिळाखालील क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत भारताचा प्रथम क्रमांक लागतो . तिळाच्या तेलास जागतिक बाजारपेठेत फार मागणी असून , प्राचीन काळापासून तिळाचे तेल खाद्यतेल म्हणून वापरल्या जाते . तसेच लहान मुलांना तीळ अणि गुड खायला दिल्याने लहान मुलांचे हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते.
हवामान व जमीन :
तीळ पीक खरीप , अर्धरबी , उन्हाळी या तिनही हंगामात घेता येते . या पिकास २५ ते २७ अंश सें . उष्णतामान पोषक असून सतत येणाऱ्या पावसाचा उत्पन्नावर विपरित परिणाम होतो . तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्वप्रकारच्या जमिनीत घेता येते . अर्धरबी हंगामासाठी ओलावा धरून ठेवणारी भारी जमीन निवडावी .
पूर्वमशागत व भरखते :
१. तिळाचे बियाणे बारीक असल्याने उन्हाळ्यात उभी , आडवी वखरणी करून जमीन चांगली भुसभुशीत तयार करावी . काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे व पठाल फिरवून पेरणी करावी .
२. अर्धरबी हंगामासाठी वखराच्या पाळ्या देऊन जास्तीत जास्त पाणी शेतात मुरवावे . जमीन तयार करतांना प्रती हेक्टर १० टन चांगले कुजलेले शेणखत / कम्पोस्ट खत द्यावे .
बियाण्याचे हेक्टरी प्रमाण :
खरीप व अर्धरबी हंगामाकरिता प्रति हेक्टरी १.५ ते २.० किलो तर उन्हाळी हंगामाकरिता ३.० ते ४.० किलो बियाणे वापरावे .
बीज प्रक्रिया :
पेरणीपूर्वी थायरम , कार्बेन्डाझिम किंवा ब्रासिकाल यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति किलो ३ ग्रॅम , तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी .
पेरणीची वेळ :
खरीप : जूनचा शेवटचा किंवा जुलैचा पहिला आठवडा .
अर्धरबी : सप्टेंबरचा पहिला पंधरवाडा .
उन्हाळी : फेब्रुवारीचा पहिला पंधरवाडा .
पेरणीची पद्धत :
बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळू किंवा गाळलेले शेणखत किंवा राख मिसळावी . पाभरीने , ( तिफणीने ) ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी .
आंतरपिके :
तीळ हे आपत्कालीन पीक , आंतरपीक आणि मिश्र पीक म्हणून घेता येते . आंतर पीक पद्धतीमधे तीळ + मूग ( ३ : ३ ) , तीळ + तूर ( ३ : १ ) , तीळ + उडीद ( ३ : ३ ) , तीळ + सोयाबीन ( २ : २ ) , तीळ + कपाशी ( ३ : १ ओळ ) हे फायदेशीर आढळून आलेले आहे .
रासायनिक खताची मात्रा , वेळ :
पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र ( १२.५ किलो / हे . ) व पूर्ण स्फुरद ( २५ कि . / हे . ) देऊन दुसरा हप्ता पेरणीनंतर ३० दिवसांनी उरलेल्या नत्राचा ( १२.५ कि . / हे . ) द्यावा . एकेटी -६४ या वाणाकरिता रासायनिक खताची मात्रा ४० किलो नत्र व २५ किलो स्फुरद प्रती हे . एवढी द्यावी . तसेच पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर या खताच्या मात्रा २० किलो / हे . या प्रमाणात दिले असता उत्पन्नात वाढ होते .
विरळणी / खाडे भरणे :
पेरणीनंतर ७-८ दिवसांनी खाडे ( नांगे ) भरावेत . पेरणीनंतर १५-२० दिवसांनी पहिली व त्यानंतर ८ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपांत १०-१५ सें.मी. अंतर ठेवावे . म्हणजे शेतात हेक्टरी २.२५ ते २.५० लाख रोपांची संख्या राहील .
आंतरमशागत व तण व्यवस्थापन :
आवश्यकतेनुसार २-३ कोळपण्या / खुरपण्या करून व निंदा करून शेत स्वच्छ ठेवावे . पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची काळजी घ्यावी .
ओलीत व्यवस्थापन :
उन्हाळी पिकास / अर्ध रबी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२-१५ दिवसांनी ओलीत करावे . फुलोऱ्यास सुरुवात होताना व बोंड्या धरताना ताण पडल्यास संरक्षित ओलीत द्यावे . ओलीत करतांना पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी .
कापणी , मळणी :
तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी सांडते व नुकसान होते . त्यामुळे कापणी वेळेवर करावी . झाडाची पाने पिवळी पडून बोड्या पिवळ्या होण्यास सुरुवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजावे . कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात . ३-४ दिवसांनी बोड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर पेंढ्या हळूच उलट्या धरून काठीच्या सहाय्याने तीळ झाडावे . काही बोड्या तडकल्या नसल्यास ४-५ दिवसांनी परत पेंड्या झाडाव्यात व बियाणे स्वच्छ करून व वाळवून साठवावे .